“धनत्रयोदशीला लिंगाणा किल्ल्यावर आपल्याला मशाली लावायच्या आहेत! तू येणार आहेस का?”, फोनवर अरुण सरांचा आवाज आला.
शिवछत्रपतींच्या लाडक्या रायगडाचा अंगरक्षक, बोराट्याच्या नाळेचा पहारेकरी, सह्याद्रीचा मूर्तिमंत रौद्ररूप धारण केलेला असा हा सुळकावजा किल्ला! जवळ जवळ ६५० फुटी शिवलिंगच जणू! समुद्र सपाटी पासून २९६९ फूट असलेला, गगनास भिडलेला, बुलंद, बेलाग, दुर्गम असा हा गड! मित्रांना मित्र आणि शत्रूला भयावह शत्रू वाटणारा, प्रथमदर्शनी धडकी भरवणारा आणि माझा आवडता असा हा लिंगाणा किल्ला! म्हणूनच अरुण सरांनी विचारल्यावर मी विनाविलंब उत्तर दिले, “होय सर! मी नक्की येणार!”
मुंबईच्या शिवराज्याभिषेक सोहळा समिती (तिथीनुसार) ह्यांनी श्री. अरुण सावंत यांना एक विनंती केली होती. दरवर्षी ही समिती रायगडावर मोठ्या धुमधडाक्याने शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा साजरा करते. गेली कित्येक वर्षे त्यांचे हे कार्य अविरत चालूच आहे. तसेच दर धनत्रयोदशीला रायगड मशालींच्या उजेडात रात्री उजळून निघतो तोही ह्यांच्याच प्रयत्नांनी! गडावर ३०० हून अधिक मशाली पेटवल्या जातात. पण ह्या २०१३ ची धनत्रयोदशी जराशी वेगळी असणार होती. रायगडाच्या जगदीश्वर मंदिर व समाधीस्थळ येथून समोर उभा असलेला लिंगाणा दिसतो. लिंगाण्यामागे नजर फेकली तर दिसतात ते राजांचे अत्यंत आवडते किल्ले – तोरणा आणि राजगड! ह्या वर्षी १ नोव्हेंबरला, धनत्रयोदशीला लिंगाण्याच्या माथ्यावर मशालींचा जागर करायचा होता! आणि त्याची जबाबदारी समितीने अरुण सरांच्या अनुभवी खांद्यांवर सोपवली होती. ह्या कार्यासाठी अरुण सरांसारख्या कसलेल्या गिर्यारोहकाने आमच्या सारख्या नवशिक्यांची निवड करावी हे आमचे भाग्यच होते!
लिंगाणा चढून त्यावर मशाली पेटवणे हे आमचे ध्येय जरी असले तरी आमचा आणखी एक छुपा हेतू होताच अन तो म्हणजे लिंगाण्याच्या माथ्यावर मुक्काम करणे! आजपर्यंत कुणीच हे केले नव्हते! पेशवाईच्या अस्तानंतर जवळ जवळ २०० वर्षांनी लिंगाण्याच्या माथ्यावर मुक्काम करणारे आम्ही कदाचित पहिलेच असू! अनेक गिर्यारोहक लिंगाण्यावर चढाई करून मध्यावर असलेल्या गुहेत अथवा खिंडीत मुक्कामाला जातात, या पूर्वी मी देखील गेलो होतो. पण आपण लिंगाण्याच्या माथ्यावर मुक्काम ठोकायचा हे अरुण सरांनी आधीच सांगितल्यामुळे ह्या मोहिमेचं आकर्षण अधिकच वाढलं!
ह्या मोहिमेसाठी निवड झालेले आम्ही १९ जण होतो. मुंबईतून अनेक ठिकाणांहून मंडळी जमा होणार होती. इतकेच नव्हे तर खुद्द महाडहून १४ वर्षांचा मिहीर बुटाला हा उत्स्फूर्तपणे सहभागी होत होता! माझ्यासोबत माझे मित्र श्रीनिवास, सागर व सुदेश होते . त्यांची लिंगाणा चढण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे ते भलतेच उत्सुक होते!

३० ऑक्टोबर २०१३ च्या रात्री आम्ही मुंबईहून महाडकडे निघालो – सोबत प्रस्तरारोहणाचे साहित्य, दोर, तंबू आणि जेवणाचे जिन्नस! माथ्यावर लावण्यात येणाऱ्या मशाली महाडहून बसमध्ये चढवल्या जाणार होत्या. मिहीरचे वडील, श्री. राजेश बुटाला येऊ शकणार नव्हते पण मशाली तयार करण्याची जबाबदारी त्यांने आपणहून स्वीकारून ती लीलया पार पाडली होती. ३१ तारखेला सकाळी ४ वाजता आम्ही जेव्हा महाडला पोहोचलो तेव्हा नेहमीचे स्मितहास्य करीत राजेश्दादा, त्यांनी मेहनतीने तयार केलेल्या २१ मशाली आणि वाफाळता गरमा-गरम चहा आमच्या स्वागतास सज्ज होता! काही काळ विश्रांती घेऊन आम्ही महाडहून लिंगाण्याच्या पायथ्याशी असलेल्या पाने गावाकडे निघालो. कोकणातले अवघड, वळणदार रस्ते कापीत जेव्हा आमची बस पाने गावात पोहोचली तेव्हा सकाळचे १० वाजले होते! आकाशात सूर्य तळपत होता, हवेतील गारवा गायब झाला होता आणि त्या दमट वातावरणात घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या!
पाने गावात आम्हाला श्री. बबन कडू भेटले. गिर्यारोहणाच्या क्षेत्रात लिंगाणा म्हटलं की बबनदादांचं नाव आपसूकच येतं! अगणित वेळा लिंगाणा सर करणारा हा अनुभवी रांगडा वीर आम्हाला वाटाड्या म्हणून मिळाला हे आमचे महत् भाग्यच!


सर्व साधन–सामग्रीचे वाटप करून आम्ही १९ जण बाबांदादांच्या मागे निघालो. गावामागे लिंगाणा किल्ला दिमाखात उभा आहे. ही चढाई तीन टप्प्यात होणार होती. पाने गावातून सुमारे तासभर चढाई केल्यावर लिंगाणा माचीवरील कडसरी गाव लगते. येथून परत २ तासांची चढाई करत लिंगाणा किल्ल्याला वळसा घालायचा की मग शेवटचा प्रस्तरारोहणाचा तप सुरु होतो! पण गर्मी, वाढतं ऊन , आदल्या रात्री पडलेला पाऊस आणि त्यामुळे दमट झालेली हवा ह्यामुळे पहिल्याच चढाईला आमची दमछाक झाली. दीड तास चढून आम्ही लिंगाणा माचीवर कडसरी येथे पोहोचलो. गाव ओस पडला होता. गावात दगडी बांधकामाची, ऐसपैस ओसरी असलेली आणि एकेकाळी माणसांनी गजबजलेली घरे आज रिकामी होती. पावसाळ्यात येथे दरड कोसळते व तो धोका लक्षात घेऊन सरकारने काही वर्षांपूर्वी हे गाव इथून हलवलं. तेव्हापासून हे गाव ओस पडले आहे!


सन १७१८ मध्ये कडू कुटुंबाने स्थापन केलेल्या जननी देवी मंदिरात काही वेळ आम्ही विश्रांती घेतली व फिरून चढाई सुरु केली! आता चढ वाढला होता. इथून चढून आम्हाला लिंगाण्याच्या कड्यामध्ये खोदलेल्या गुहेत पोहोचायचं होतं. तिथे भोजन करून आम्ही पुढच्या कामगिरीला लागणार होतो. पण एरवी सोपा असलेला रस्ता आता कठीण झाला होता. पावसाळ्यात माजलेले गवत व त्यात लुप्त झालेल्या वाटा शोधणे कठीण होते व इथे बबनदादांची खूप मदत आम्हाला झाली! गावात कापीत, रान तोडीत कुशलतेनं रस्ता शोधत ते सर्वात पुढे चालले होते! सुमारे दोन अशीच तासाच्या घाम काढणाऱ्या चढणीनंतर आम्ही एकदाचे गुहेत पोहोचलो! एव्हाना सूर्य डोक्यावर येऊन आग ओकीत होता, घामाच्या धारा शरीरातून वाहत होत्या आणि पोटात कावळे भुकेचा टाहो फोडीत होते! आता जेवणे गरजेचे होते. सगळ्यांचे डबे उघडताच आम्ही जेवणावर तुटून पडलो. काही मिनिटातच जेवणाचा पद्धतशीर फडशा पाडला गेला आणि तृप्त झालेले जीव सावलीच्या आश्रयाला जाऊन एक लघु वामकुक्षी घेऊ लागले. या गुहेजवळ पाण्याचं सुरेख टाकं आहे. पाणी पिण्याजोगं व थंडगार आहे. तिथेच आम्ही पोटभर पाणी पिऊन मग आमच्या बाटल्या भरून घेतल्या! आता लिंगाण्याच्या मधल्या गुहेपर्यंत कुठेही पाणी अथवा निवारा नव्हता. ताजेतवाने झालेले आम्ही परत निघालो. आता किल्ल्याला वळसा घालून, एका अरुंद वाटेवरून पुढे जायचे होते. उजव्या बाजूला खोल दरी, डाव्या बाजूला उभा कडा आणि मध्ये अरुंद नागमोडी वाट! समोर दिसणारा नजरा विलोभनीय होता! हिरवीगार चादर पांघरलेला रांगडा सह्याद्री सभोवताली पसरला होत. दूर पाण्याच्या दोन धारा खाली डोहात कोसळत होत्या. पण आम्ही ह्या दृश्याच्या सौंदर्यास बळी न पडता, पायाखाली निट लक्ष ठेवून चाललो होतो. नाहीतर “चुका ध्यान, गई जान” ही महामार्गांवरील म्हण इथे चुकून खरी ठरायची!
ही वाट मध्येच तुटलेली आहे. सरळ चालत जाणे शक्यच नाही. दोराच्या सहाय्याने हा टप्पा पार करावा लागतो. सगळ्यांनी पटापट आपापल्या हार्नेस चढवून घेतल्या व सज्ज झाले. एकावेळेस एकाच माणूस इथून जाऊ शकत होता. इथे बबनदादांनी पुढाकार घेतला. सरळ रस्त्यावर चालावे इतक्या सहजतेने तो कातळटप्पा पार करून दुसऱ्या बाजूला दोर बांधला जेणेकरून बाकीच्या लोकांना दोराच्या सहाय्याने तो टप्पा पार करणे सोपे झाले! मग काय, लोकांनी पटापट तो टप्पा पार केला व आम्ही सर्व परत निघालो शेवटच्या चढाईच्या दिशेने!


इथून आणखी २० मिनिटे चालल्यावर आपण थेट लिंगाण्याच्या कातळाला भिडतो. या ठिकाणी पोहोचायला आम्हाला ४ वाजले होते. अजून काही मंडळी तुटलेला कातळटप्पा पार करत होती. अरुण सर आणि बबनदादा दोर पावून पुढे गेले होते. नुकताच पाऊस झाल्यामुळे माती भुसभुशीत आणि कातळ गुळगुळीत झाला होता. यामुळे अगोदरच उभा असलेला चढ आणखी कठीण झाला होता. आमची गती पण यामुळे मंदावली!
अरुण सर, मी आणि मागच्या कातळटप्प्यावर देखरेख करणारे स्वप्नील पालव व कुणाल देशमुख असे आमचे तीन गट Walkie-Talkie च्या सहाय्याने एकेमेकांच्या संपर्कात असल्यामुळे मोहिमेचे व्यवस्थापन सोपे झाले होते. एकमेकांशी संवाद साधून आम्ही अंदाज घेत घेत चढत होतो. माझ्या गळ्यात लटकलेला Walkie-Talkie खरखरला. अरुण सर बोलत होते,
“प्रांजल, आम्ही गुहेपर्यंत पोहोचलोय. तुमची स्टेटस काय आहे? ओव्हर.”
“सर, प्रांजल बोलतोय. स्वप्नील मागे कातळटप्प्यावर आहे. अजून त्यांना यायला अवकाश आहे. मी Climbing सुरु करतोय.ओव्हर”
“ठीक आहे. तू तुझ्याबारोबारील मुलांना घेऊन लवकरात लवकर चढ. अंधार पडायच्या आत माथा गाठायचाय! ओव्हर.”
“ओके सर. ओव्हर अँड आउट!”
आम्हाला ३१ तारखेलाच लिंगाणा सर करणे गरजेचे होते कारण रात्री १२ वाजता मशाली पेटवून रायगडावरील लोकांना इशारत द्यायची होती. आता ४ वाजून गेले होते. उजेड फार फार तर २ तास टिकणार होता. काळोखात प्रस्तर चढणे म्हणजे कठीण कर्म आणि त्यात परत अमावस्या असल्यामुळे डोळ्यासमोरचे अंधारात काहीच दिसणार नव्हते. मग प्रस्तर चढणे तर दूरची बात!
अचानक हालचालींना वेग आला. मी पटापट सागर, श्रीनिवास अन सुदेश यांना घेऊन प्रस्तर चढणे सुरु केले. १५-२० मिनिटात लिंगाण्याच्या गुहे पाशी आम्ही पोहचलो. इतक्यात अरुण सर वर चढून गेले होते. मी Walkie-Talkie वरून सरांना आम्ही पोहोचल्याची वर्दी दिली. स्वप्नीलची तुकडी कातळ पार करून प्रस्ताराकडे तातडीने निघाली होती. सागर अन श्रीनिवास ह्यांना पाणी भरण्यास मी पाठवून दिले. आजचा आमचा मुक्काम माथ्यावर होता आणि ही गुहा म्हणजे पाणी मिळण्याचे शेवटचे ठिकाण. एकदा इथून वर गेलात की पाणी थेट दुसऱ्या दिवशी मिळाले असते. म्हणून आम्ही बाटल्या भरून घेतल्या. तोपर्यंत स्वप्नीलच्या तुकडीचे काही लोक गुहेपर्यंत पोहोचू लागले.
इतक्यात माझा Walkie-Talkie परत खरखरला व त्यातून अरुण सरांचा परिचित आवाज आला,
“प्रांजल, खूप उशीर झालाय. जे खाली असतील त्यांना गुहेत मुक्काम करू दे. त्यांना वर घेऊन येणे आज शक्य होणार नाही. तुम्ही लोकं वर या! ओव्हर!”
ही बातमी खाली असलेल्या मुलांना सांगणे खूप कठीण होते. पण ते तितकेच गरजेचे होते. गिर्यारोहण मोहिमेत असे कठोर निर्णय घ्यावे लागतातच. मी सरांचा हा निर्णय जेव्हा आगे असलेल्या मुलांना कळवला तेव्हा त्यांनी मला विनंती करून माझे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. इतक्या दूरवर येऊन त्यांना लिंगाणा चढता येणार नव्हता – केवळ वेळेअभावी! ते माझे मित्र जरी असले तरी मला त्यांच्याशी कठोर वर्तन करावे लागले ह्याचे कारण गिर्यारोहण करताना असे निर्णय डावलून जर मी त्यांना सोबत घेतले असते तर अंधारात चढाई करताना ते कदाचित जीवावर ही बेतू शकले असते! म्हणून त्यांना खालील गुहेत मुक्काम करायला लावून आम्ही गुहेच्या मागील ४० फुटी प्रस्तर चढण्यास पुढे सरसावलो!

एव्हाना अंधार पडायला लागला होता म्हणून मी सरसर चढत तो प्रस्तर पार केला. वर बोल्टला दोर अडकवला अन सुदेश, श्रीनिवास अन सागर ह्यांना वर घेतले. आमचे सामान आता ओढायचे होते. स्वप्नील आणि कुणाल तिथे पोहोचले होते . त्यांनी सामानाला दोर अडकवला आणि आम्ही खेचायला सुरुवात केली आणि इथेच सगळा घात झाला! अंधार पडायला लागल्यामुळे मी डोक्याला हेड-लँप लावला होता, समान ओढताना मी किंचित जास्त झुकलो आणि तो दिवा डोक्यावरून निसटून, प्रस्तरावर आपटत खाली पायथ्याला जाऊन पडला! स्वप्नीलने हेड-लँप उचलला तेव्हा तो चालू होता पण त्याचे ३-४ तुकडे झाले होते. आता मला पुढची चढाई मिट्ट अंधारात करायची होती!
सोबत श्रीनिवास होताच. त्याला म्हणलो, “श्रीनिवास, आता माझी यशस्वी चढाई तुझ्या दिव्याच्या उजेडावर अवलंबून आहे! मी पुढे पुढे चालतो, तू मला सावलीसारखा चिकटून चाल म्हणजे उजेडाचा उपयोग मला पण होईल!” तो लगेच तयार झाला – दुसरा पर्याय नव्हताच! मग स्वप्नीलला माझा हेड-लँप घेऊन यायला सांगून आम्ही आता अंधारात वर चढायला सुरुवात केली. ठेचा खात, धडपडत, अमावास्येच्या काळोख्या रात्री एकमेकांचे सहकार्य करीत आम्ही चढत होतो. सोबतीला आधार म्हणून हाती दोर आणि डोक्यावरील विजेरीचा अंधुक प्रकाश!
किती चढाई बाकी आहे ह्याचा अंदाज लागणे देखील कठीण होते. पण तरीही मी लिंगाणा ह्यापूर्वी सर केल्याने मी अंदाज लावत होतो. अचानक समोरून एक विजेरी चालत आली.
डोळ्यावर हात ठेवत मी समोरच्या विजेरीला विचारले, “कोण? अरुण सर? अजून किती वेळ लागेल पोहोचायला?”
सर हसले, “ अरे तुम्ही माथ्यावरच आहात! चला!”
अक्षरशः अचानक, नकळत आम्ही लिंगाणा सर केला होता!!
आणि तेव्हा रात्रीचे बरोब्बर ८ वाजले होते!! एकमेकांवर अभिनंदनाचा वर्षाव करीत आम्ही आमच्या “छावणीत” पोहोचलो! सामान खाली ठेवले, जमिनीला पाठ टेकवली आणि आकाशाकडे नजर गेली. एखाद्या खजिन्यातील हिरे-माणके चमकावीत तसे असंख्य तारे आकाशात लुकलुकत होते! आकाशगंगेची धुरकट आकृती नजरेस पडत होती! विश्वाच्या विशाल रुपाची ती एक छोटी झलक होती. माणूस म्हणून आपण किती नगण्य आहोत ह्याची जाणीव अशा वेळी होते! थकलेले शरीर विसावले आणि वाऱ्याची वाहणारी मंद झुळूक मनाला एक नवीन ताजेपणा देत होती!
इतक्यात स्वप्नील, कुणाल आणि इतर मंडळी पोहोचली. आम्ही एकूण ११ जणांनी लिंगाणा सर केला होता! त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले.
पण अजून काम अर्धेच झाले होते. रात्री १२ च्या ठोक्याला मशाली पेटायला हव्या होत्या. वाऱ्याचा जोर वाढत होता. ह्या वाऱ्यात मशालींच्या ज्योती टिकवून ठेवणे महत्वाचे होते. कारण रायगडावरील शिवभक्तांना त्या दिसणे गरजेचे होते!
मग कामाची विभागणी करण्यात आली. अरुण सर, मी आणि श्रीनिवास तंबूमध्ये शिरलो अन आम्ही स्वयंपाकाची जबाबदारी स्वीकारली. बाहेर स्वप्नील, सागर आणि मंडळी मशालींचे बोळे तेलात भिजवून, ते पेटवण्याच्या मागे लागली!

जसा तंबूमध्ये जेवणाचा अगदी फक्कड बेत जमून येत होता तसाच बाहेर देखील मशाली पेटवण्याच्या प्रयोगांना यश येत होते. वाऱ्यामुळे काही मशाली विझत होत्या पण बऱ्याच मशाली वाऱ्याला न जुमानता फुरफुरत होत्या. हे पाहून मशालींच्या उजेडात मुलांच्या चेहऱ्यावर समाधानी भाव उमटत होते.
बाहेर थंडीत कुडकुडत बसलेल्या भुकेल्या जीवांना तंबूतील तयार होत असलेल्या जेवणाचा सुगंध अस्वस्थ करीत होता. त्यामुळेच, “जेवण तयार आहे!” अशी अरुण सरांनी घोषणा करताच सगळ्यांनी तंबूमध्ये धाव घेतली. टोमॅटो सूप, ठेपले, पिठलं, श्रीखंड आणि बबनदादांच्या घरच्या भाकऱ्या असा गरमा-गरम साग्रसंगीत बेत तयार होताच. काही क्षणातच पोरांनी जेवणाचा समाचार घेतला आणि समाधानाचे ढेकर देतंच तंबूच्या बाहेर पडले!
सगळी आवरा-आवर होईस्तोवर ११ वाजून गेले होते. तासाभरातच रायगडावर मशालींचा जागर सुरु होणार होता आणि त्याला उत्तर लिंगाण्यावरून दिले जाणार होते. मग प्रत्येकी दोन –दोन मशाली देण्यात आल्या. त्यातील बोळे तेलात चिंब भिजवण्यात आले. मध्यरात्रीचे ठोके होताच मशाली पेटवल्या गेल्या. वाऱ्यावर मशाली पेटवणे अवघड होतेच पण त्या पेटत ठेवणे म्हणजे कमालीची कसरत! इथून वारा आला की तिथे वळा, इथे हात ठेवून वारा अडवा, विझलेल्या मशाली पुन्हा पेटवा – असे नाना उद्योग करीत आम्ही मशाली पेटत्या ठेवत होतो! पण रायगडावर मशाली दिसत नव्हत्या! दूर नगारखान्याच्या दिशेला, राजदरबारात अंधुक उजेड दिसत होता. आमचा उत्साह वाऱ्यामुळे फडफडणाऱ्या ज्योतींसारखा डळमळू लागला.

आणि इतक्यात सुदेशला जगदीश्वर मंदिराकडे दोन मिणमिणते दिवे दिसले! जगदीश्वर मंदिराकडे दोन मशाली पेटल्या होत्या! रायगडाला जाग आली होती! हे दृश्य पाहताच लिंगाण्यावर एकाच जल्लोष झाला! लिंगाण्यावरून दिलेल्या इशारतीला रायगडाने उत्तर दिले होते! लिंगाण्यावर २१ मशाली आनंदाने नाचू लागल्या!! आमचा हेतू सफल झाला होता! धनत्रयोदशीला लिंगाण्यावर मशालींचा जागर आम्ही केला होता!
ह्या जल्लोषात कुणीतरी उत्स्फूर्तपणे गगनभेदी घोषणा दिली,
“ प्रौढप्रताप पुरंदर गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधीरज
छत्रपती शिवाजी महाराज की…”
आणि एकाच वेळी आमच्या आवाजाने सारा आसमंत दुमदुमला, “जय!!!”


लिंगाण्याच्या माथ्यावर मुक्काम करणारे बहुदा आम्हीच पहिले असू! – (छायाचित्र – अरुण सावंत)
-प्रांजल वाघ
YouTube Channel : Son Of Sahyadris
२१ सप्टेंबर २०१४
(विशेष आभार : कै.श्री. अरुण सावंत )
“ज्यांच्यामुळे सह्याद्रीतील भटकंती खऱ्या अर्थाने करायला शिकलो त्या आमच्या गुरुवर्य अरुण सावंत यांना समर्पित“
(छायाचित्र साभार : कै. श्री. अरुण सावंत, ओंकार ओक, सुदेश रेणुसे, प्रांजल वाघ)

This work by Pranjal A. Wagh is licensed under a Creative Commons Attribution-Noncommercial-No Derivative Works 2.5 India License.
This means that you must attribute the work in the manner specified by me in a proper manner – for example – a link back to the content which you used as the source (but not in any way that suggests that I endorse you or your use of the work).
This also means that you may not use this work for commercial purposes and you may not alter, transform, or build upon this work. Click the link above to read the full license.
2 comments
लिंगाणा थरार…! मस्तच, प्रांजल, अगदी छान लिहिलंयस!अरुण सरांच्या आठवणीनं डोळ्यांच्या कडा पानावल्या बघ.
धन्यवाद!! अरुण सरांची आठवण कायमच मनाला हळवं करून जाते!