मराठ्यांच्या अधिपत्याखाली असलेला, तीन टेकड्यांवर वसलेला अभूतपूर्व दुर्ग!
“आज्ञापत्र” या आपल्या ग्रंथात रामचंद्रपंत अमात्य लिहितात,
“गडाच्या आश्रयाने एखादा डोंगर असावा की जो गडास मारक होय, तरी तो डोंगर खोदून काढावा. इतके न घडे तरी त्यावरही एखादा बुरूज किंवा एखादा कोट बांधून मुख्य गडाशी मिळवून घ्यावा.”
हाच सिद्धांत वापरून अनेक गडकिल्ले बांधलेले पाहायला मिळतात. महाराष्ट्रात पुरंदर-वज्रगड, अंकाई-टंकाई, राजमाची असे अनेक जुळे किल्ले आहेत तर छत्रपती शिवरायांनी बांधलेली, सध्या तमिळनाडूमध्ये असलेली स्वराज्याची तिसरी राजधानी “जिंजी” ही तर तब्बल ३ डोंगरांवर वसली आहे! आमच्या कर्नाटकच्या सफरीत आम्ही असे अनेक जुळे किल्ले पाहिले पण २०२२ मध्ये आम्हाला आडवाटेला एक उपेक्षित दुर्गरत्न गवसले! ३ टेकड्यांवर पसरलेला हा दुर्ग थेट होयसळ-चालुक्यांशी नातं सांगतो! आणि आश्चर्य म्हणजे या किल्ल्यावर १८व्या शतकाच्या शेवटच्या दशकात मराठ्यांचा भगवा जरीपटका फडकत होता!

बेन्ने डोशासाठी प्रसिद्ध असणाऱ्या दावणगेरे शहराच्या पूर्वेस आणि ७ डोंगरावर पसरलेल्या चित्रदुर्गाच्या किल्ल्याच्या उत्तरेस “कनकुप्पे” नावाचं एक छोटंसं खेड लागतं. त्या गावाच्या मागच्या टेकडीवर आपल्याला काही तटबंदी दिसते. तोच हा कनकुप्पे दुर्ग! सुरुवातीला हा दुर्ग जेव्हा आपण खालून पाहतो तेव्हा वर काय दिव्य वाढून ठेवलंय लक्षात येत नाही! डोंगराच्या मध्यभागी असलेल्या तटबंदीत लपलेला, किल्ल्याचा प्रथम प्रवेशद्वारातून आपण पाऊल आत टाकले की लक्षात येतं की मुख्य किल्ल्याच्या उजवीकडे असलेल्या टेकडीवरसुद्धा तटा-बुरुजांचे थर चढले आहेत! आणि यातील कोणत्याही टेकडीवर चढल्यावर या दोघांच्या पलीकडे असलेली एक मोठी किल्लावाजा टेकडी नजरेस पडते! म्हणजे हा किल्ला ३ टेकड्यांवर पसरला आहे आणि या तिन्ही टेकड्यांच्या मध्यभागाला तटा-बुरूजा-दरवाजांचे कुंपण घालून सुरक्षित करून घेण्यात आले आहे!

होयसळ, चालुक्य, बहामनी राजवटी पाहिलेल्या, जगलूर तालुक्यात असलेल्या या किल्ल्याला विजयनगर साम्राज्याच्या काळात आजूबाजूचा परिसर आणि व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वापरण्यात यायचे. चित्रदुर्गच्या पाळेगार नायकांच्या “चिक्कनायकाने” हा बांधला असं म्हणतात. त्तीन ही टेकड्यांवर मुबलक पाणी साठ करून ठेवण्यात आलेला आहे. टेकड्यांच्या पायथ्याशी एक बारव आहे आणि देवीचं देऊळदेखील! आज ही अनेक इमारतींचे अवशेष, जोती टिकून आहेत.

छत्रपती शिवरायांनी आपल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान या भागातून प्रवास जरी केला नसला तरी थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पहिल्या कर्नाटक स्वारीत त्यांनी चित्रदुर्ग येथील नायकांकडून चौथाई-सरदेशमुखी गोळा केली तेव्हा कनकुप्पेचा त्यात समावेश असण्याची शक्यता आहे. पुढे नानासाहेब पेशव्यांनी जेव्हा कर्नाटकात थेट श्रीरंगपट्टण पर्यंत मुसंडी मारली तेव्हा चित्रदुर्गचे पाळेगार नायक मराठ्यांचे मांडलिक बनले.

१७६१ मध्ये पानिपतच्या युद्धात झालेलं मराठ्यांचं नुकसान पाहून हैदरने कर्नाटकात मुसंडी मारून चित्रदुर्ग, कनकुप्पे आपल्या ताब्यात आणला खरा पण माधवराव पेशव्यांनी १७७०-७१ मध्ये हा भाग पुन्हा मराठ्यांच्या अधिपत्याखाली आणला. पुढे टिपू सुलतानाविरोधात मराठ्यांनी इंग्रजांसोबत आघाडी उघडली तेव्हा १७९१ मध्ये सरदार परशुरामभाऊ पटवर्धन यांनी हा संपूर्ण प्रदेश कनकुप्पे सोबत काबीज करून स्वराज्यात आणला!
मराठ्यांशी एक दीर्घ नातं सांगणारा असा हा दुर्लक्षित पण दुर्ग स्थापत्याचा एक वेगळं अविष्कार असलेला कनकुप्पे दुर्ग इतिहासप्रेमींनी नक्की पहावा!
–प्रांजल वाघ
Instagram: @sonofsahyadris
Facebook : Son Of Sahyadris
Youtube : Son Of Sahyadris





2 comments
Khup chaan varnan…. Kahi goshti ajibaat aikivaat nastat tya tuzhya lekhanatun aamchya paryant pohochatat. Tya baddal khup khup aabhar…. ..hya sarv thikani jaychi khup iccha nirman zali aahe tuazhya mule. Thank you
मनःपूर्वक आभार!!
जमल्यास नक्की जाऊ फिरायला!!