सोळाव्या शतकात बिम्बस्थान म्हणजे मुंबई आणि साष्टी पोर्तुगीजांच्या ताब्यात गेली. थेट दिऊ-दमण ते चौल पर्यंत पोर्तुगीजांची क्रूर सत्ता या परिसरात थैमान घालू लागली. पुढे १६६५ साली पोर्तुगीजांनी हुंड्यात हा सात बेटांचा समूह इंग्रजांच्या ताब्यात दिला. याच बेटांतील “परळ” या बेटाचं उत्तर टोक म्हणजे “शीवचा दुर्ग” – मुंबईच्या उत्तरी सीमेचा रक्षणकर्ता आणि एकमेव असा “गिरिदुर्ग”!

“शीव” म्हणजे सीमा किवा वेस! “सायन” हा शीवचा पोर्तुगीज अपभ्रंश! पोर्तुगीजांनी आपल्या राजवटीत ही टेकडी तटा-बुरुजांनी मजबूत करून घेतली होती पण मुंबईचे पहिले गव्हर्नर – जेराल्ड ऑन्जीयर यांनी खऱ्या अर्थाने हा किल्ला साधारण १६६५-१६७१च्या आसपास बांधून काढला. जवळच एका टेकडीवर “रीवा” नामक एकांडा बुरुज बांधून काढला गेला.
पुढे १७३३-३९ असे दीर्घकालीन युद्ध करून चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पोर्तुगीजांचं नामोनिशान उत्तर फिरांगाणातून मिटवून टाकलं. दिऊ-दमण ते आजचं वांद्रे-ठाणे-उरण इथपर्यंत मराठी राज्याच्या सीमा भिडल्या! इंग्रजांनी मराठ्यांच्या भीतीने मुंबईतील सर्व कोटांची डागडुजी करून ते मजबूत करून घेतले. त्यात शीवच्या दुर्गावर ३२ सैनिक व त्यांचं एक म्होरक्या असे कायम केले. किल्ला तोफांनी सज्ज केला गेला. किल्ल्यावर या सैनिकांची राहण्याची सोय, शौचालय, दारू कोठार इत्यादी वास्तू होत्या -त्यांचे अवशेष आजही दिसतात. किल्ल्यावर पाण्याची २ बांधून काढलेली टाकी देखील आढळतात. इथे आजही एक तोफ आहे!



पुढे पुढे जशी मराठी ताकत कमी होती गेली तसं इंग्रजांनी हळू हळू खाडी ओलांडून मराठ्यांचा प्रदेश जिंकू लागले. १८१८ मध्ये मराठेशाही खालसा झाल्यावर इंग्रजांना भारतात कोणी शत्रू उरलाच नाही आणि या किल्ल्याचं महत्व अस्तास जाऊ लागले. भराव टाकून खाडी भरली, मुंबईच्या सीमा विस्तारल्या. मग विमानं आली, क्षेपणास्त्र आली आणि किल्ले कालबाह्य होऊ लागले. मुंबईच्या झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणात, भयंकर वेगवान जीवनात पैसा आणि प्रगतीच्यामागे हात धुवून लागलेल्या माणसाने आपल्या फायद्यासाठी निसर्गाच्या आणि मानवतेच्या ऱ्हासाच्या साऱ्या सीमा पार केल्या तिथे या लहानग्या “शीव”च्या किल्ल्याची काय बात करता?

२०२५ सालचा पहिला सूर्योदय या किल्ल्यावरून पाहताना सहज म्हणून उत्तरेकडे नजर फेकली. प्रदूषण युक्त धुके अर्धवट झोपेत असलेल्या मुंबईवर गोधडीसारखे पसरले होते. राहून राहून वाटत होते जर १७३९ मध्ये मराठ्यांनी खाडी ओलांडून इंग्रजांपासून मुंबई मुक्त केली असती तर आज देशाचा इतिहास वेगळा असता! पण इतिहासात जर-तर ला जागा नसते!


“आय लव्ह यू” खरडलेल्या भिंती, कोपऱ्यात एकमेकांच्या मिठीत हरवलेली प्रेमी युगुलं, रील्स बनवण्यात खर्ची पडणारी पिढी माझं लक्ष वेधून घेत होती. इतिहासाबद्दल असलेली आस्था पाहून मन खिन्न झालं. गगनचुंबी इमारतींच्या वेढ्यात अडकलेल्या, कालबाह्य म्हणून निरुपयोगी ठरवून अडगळीत टाकलेल्या या ३५० वर्षीय पुराणपुरुषाचा निरोप घेऊन मी नवीनवर्षात घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या असंख्य मुंबईकरांच्या गर्दीत सामील झालो!
- प्रांजल वाघ


