आज अचानक घरी जाता जाता,
भरून आलेलं आभाळ फाटलं,
सरीवर सारी बरसू लागल्या,
आणि मनाला एकच वाटलं!
मला हवं तेव्हाच पाऊस पडावा,
मी सांगितलं, "जा!", की तो निघून जावा ,
पण असं पाऊस कुणाचं ऐकतो का?
जा म्हटलं की जातो का?
पाऊस येतो तो एकटा येत नाही,
तुझ्या आठवणी तो सोबत घेऊन येतो ,
जुन्या आठवणीत मी हरवून जाताच ,
माझे अश्रू हा पाऊस समावून घेतो !
पण ह्या पावसाचा जोर काही वेळापुरताच असतो,
थोड्याच वेळात सूर्य आकाशात हसतो,
पण तुझ्या आठवणींच असं थोडंच आहे?
पाऊस गेला तरी मी तुझ्यातच हरवून बसतो…
- प्रांजल वाघ
०२ जुलै २०१२





